कोणतही शिवकाव्य येथे शोधा

।।पराक्रमी राजा छत्रपती राजाराम।।

।।पराक्रमी राजा छत्रपती राजाराम।।
 
छत्रपती राजाराम यांचा जन्म २ मार्च १६७० रोजी छत्रपती शिवरायांच्या द्वितीय पत्नी सोयराबाई यांच्या पोटी झाला.राजारामचे लग्न सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी जानकीबाईंशी १५ मार्च १६८० रोजी झाले होते.
 
जानकीबाईच्या नंतर राजाराम यांचे लग्न सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या ताराबाई व कोल्हापूरच्या कागलकर घाटगे यांची कन्या राजसबाई यांच्याशी झाले.याशिवाय राजाराम यांना अंबिकाबाई ही आणखी एक पत्नी होती.छत्रपती संभाजीराजेंना मोघलांनी पकडल्यामुळे रायगडावर १२ फेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम यांचे मंचकारोहन झाले.
 
याच सुमारास २५ मार्च १६८९ रोजी मोघलांनी रायगडांस वेढा घातला.याप्रसंगी महाराणी येसुबाई यांनी राजाराम यांना रायगडावरून निसटून जाण्याचा सल्ला दिला.जानकीबाई रायगडावर महाराणी येसुबाई व बाळ शाहू सोबत राहिल्या तर ताराबाई, राजसबाई, अंबिकाबाई या पत्नी व प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ आदि सेनानीसह राजाराम यांनी रायगड सोडून जिंजीकडे प्रस्थान केले.वाटेत विशाळगडावर ताराबाई,राजसबाई आदिना पाठीमागे ठेवून ते जिंजीला पोहचले.
महाराष्ट्रात राजारामांनी आपल्या गैरहजेरीत धनाजी जाधव,संताजी घोरपडे, परशराम त्रिंबक, शंकराजी नारायण यांच्याकडे सुत्रे सोपविली होती.धनाजी जाधव, संताजी घोरपडे यांनी आपल्या गनिमी काव्यांनी व वेगवान हालचालींने मोघलांना वेठीस आणले होते.तर तिकडे जिंजीला राजाराम यांचा मोघलांशी संघर्ष चालू होता.मोघलांना एकाच वेळी दोन ठिकाणी लढावे लागत होते.
 
सन १६९० साली मोघल सरदार जुल्फिकारखानाने जिंजीला वेढा दिला.हा वेढा सात वर्ष चालला होता.वेढा घातलेल्या मोघलांच्या सैन्यावर हल्ले करून धनाजी जाधव,संताजी घोरपडे यांनी त्यांना वेठीस आणले होते.अखेरीस १६९७ साली जिंजी मोघलांच्या ताब्यात पडला पण तत्पुर्वी राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परतले होते.
 
महाराष्ट्रात आल्यानंतर राजाराम यांनी १६९८ साली धनाजी जाधव,परसोजी भोसले आणि खंडेराव दाभाडे यांना घेऊन खानदेशची मोहिम आखली.या मोहिमेतच त्यांची तब्येत बिघडली.मोहिमेतून त्यांना सिंहगड किल्लावर नेण्यात आले तेथेच त्यांचे निधन झाले.छत्रपती राजाराम पराक्रमी,मुत्सद्दी होते.चांगल्या माणसांची त्यांना पारख होती.राजाराम यांना ताराबाईपासून शिवाजी तर राजसबाई पासून संभाजी हे दोन पुत्र झाले होते.